पुणे –महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात 4 मे रोजी भोंग्यावर पहाटे अजान वाजतात त्याला प्रतुत्तर म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा वाजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पुण्यातही मनसे कार्यकर्ते सज्ज होते. मात्र, त्या आधीच पोलिसांनी मनसेच्या जवळपास 800 हून अधिक पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने तसेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अटकेच्या भीतीने शहरातील प्रमुख पदाधिकारी भूमिगत झाल्याने अनेक ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांनाच पुढे यावे लावले. तर काही पदाधिकाऱ्यांना अटकही झाली आहे. मात्र, या प्रकारामुळे पक्षाच्या शहरातील नेत्यांवर कार्यकर्ते नाराज असून त्यांच्याकडून सोशल मीडियासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांकडे थेट नाराजी व्यक्त केली जात आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच अंतर्गत वादाचा भोंगा वाजण्यास सुरुवात झाली आहे.
मनसे अध्यक्षांनी काहीही झाले तरी भोंगे वाजवाच असे आदेश दिल्याने पदाधिकाऱ्यांकडून जबाबदारी असलेल्या विधानसभा निहाय मतदारसंघात मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन केले होते. याचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांची दखल घेत महाआरती घेणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, शहरात केवळ कार्यकर्ते आणि ठराविक पदाधिकारीच पक्षाच्या आदेशानुसार, पुढे आल्याने इतर नेते कुठे होते, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित करत पक्षांच्या वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच असे होणार असेल तर प्रत्येकवेळी आम्हीच पोलिसांच्या समोर जायचे का, असा सवालही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
प्रदेश सरचिटणीसांकडून खुलासा
हा वाद माध्यमातून समोर आल्यानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी ही बाब चूकीची असल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाकडून हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पोलिसांकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना अटक होणार होती. त्याचा आंदोलनावर परिणाम झाला असता त्यामुळे पदाधिकारी समोर न येता एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच पक्षाने केलेल्या नियोजनानुसार, महाआरती घेण्यात आली असून त्यात आम्हाला काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.