कोंढवा (महादेव जाधव) –कोंढवा बुद्रुक येथील कात्रज बाह्यवळण मार्गालगत असलेल्या बहुचर्चित स्मशानभूमी प्रश्नावर गेली 15 वर्षे केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून केवळ राजकाणाकरीता या मुद्याचा वापर करून घेतला जात आहे. ही स्माशानभूमी अगदी रस्त्यालगतच असल्याने अंत्यविधीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीचा प्रश्न कधी निकाली निघणार? हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत असून ही स्मशानभूमी राजकारणात “मरणयातना’ सहन करीत आहे.
कोंढवा बुद्रुक येथे कात्रज बाह्यवळण मार्गालगत असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासह अंत्ययात्रा आल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी होते. या स्मशानभूमीत बसण्याची नव्हे तर उभे राहण्याचीही व्यवस्था नाही. या मार्गावर अहोरात्र हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. मोठ्या वाहतुकीमुळे अंत्ययात्रा आणण्यास व अंत्यविधी करण्यात अनेक अडचणी येतात. तर, अंत्याविधीच्या वेळी आप्तेष्टांना रस्त्यावर थांबावे लागत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन दोन-दोन किलोमिटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहतूक कोंडीमुळे छोटे-मोठे अपघात घडतात. त्यामुळे ही स्मशानभुमी अन्यत्र स्थलांतरीत करणे, विस्तारीकरण करणे असा कोणताच निर्णय राजकाणातून होत नसल्याने ही स्मशानभूमीच धोकादायक ठरू लागली आहे. या स्मशानभुमी प्रश्नावर अनेक आंदोलने, मोर्चे झाले. मात्र, हा प्रश्न काही सुटलेला नाही. राजकीय इच्छाशक्ती अभावी ही स्मशानभूमी रखडली आहे. या स्मशानभुमीचा वापर केवळ राजकारणासाठीच केला गेला आहे. निवडणुका आल्या की स्मशानभुमीचा विषय काढला जातो, निवडणुका संपल्या की या प्रश्नी कोणीही काहीही कार्यवाही करीत नाही. कोंढवा बुद्रुकच्या स्मशानभुमीचा प्रश्न सुटला नाही तर याच फटका आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारांना नक्कीच बसणार असल्याची चर्चा आहे.
खडीमशिन चौकाजवळ…
खडीमशिन चौकाजवळ गेल्या पाच-सात वर्षांपासुन नविन स्मशानभूमीचे काम सुरू आहे. पूर्वी येथे पारंपरिक व विद्युतदाहिनीची रचना केलेली होती. परंतु, यातही अनेक नाट्यमय घडामोडी घडून ही स्मशानभूमी आता केवळ विद्युतदाहिनी पुरतीच सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत केवळ राजकारण व अर्थकारण तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांनी पडत आहे.