इंद्रायणीनग (योगेश गाडगे) – पुणे-नाशिक शहरांना जोडणारा महामार्ग भोसरी परिसरातून जातो. या मार्गावर वाहनचालकांना रात्री वाहने चालविताना त्रास होऊ नये यासाठी रस्ता दुभाजकामध्ये रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. परंतु भोसरी परिसरातील बहुतांश रिफ्लेक्टर गायब झाल्याने, दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तर बऱ्याचवेळा या परिसरात अपघात झाले असून हा परिसर मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे रिफ्लेक्टर त्वरित बसवावेत, अशी मागणी होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गवरून रस्ता दुभाजकावरील समोरील वाहनाचा तीव्र प्रकाश रोखण्यासाठी रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. परंतु महामार्गावरील बहुतांश रिफ्लेक्टर गायब झाले आहेत तर काही रिफ्लेक्टर तुटून गेले आहेत. काहींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा तीव्र प्रकाशझोत रात्री थेट वाहनचालकांच्या डोळ्यांवर येत असल्याने काही काळ वाहनचालकांना गाडी चालवताना अंधाऱ्या येतात काही वेळेस पुढील काहीच दिसत नाही. त्यामुळे वाहनांना अपघात घडत आहेत. त्यामुळे महामार्ग धोकादायक बनला असून, रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
रस्ता दुभाजकावर रिफ्लेक्टर असल्यास समोरून येणाऱ्या वाहनाच्या दिव्यांचा प्रकाश रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनांच्या कांचावर पडत नाही. यामुळे वाहन चालविणे सुकर होते. रिफ्लेक्टर तुटल्याने प्रकाश थेट काचेवर पडल्याने रात्रीच्या वेळी पुढील रस्ता डोळ्यांना दिसून येत नाही. यामुळे कितीतरी वेळा वाहने दुभाजक ओलांडून अपघात घडल्याचे दिसून येते. या महामार्गवरील औद्योगिक क्षेत्र भोसरी, चाकण, मोशी या परिसराचा झपाट्याने विकास होत असून, रहदारी वाढली आहे. यामुळे महामार्गावर सुरक्षा राखणे ही महत्त्वाची जबाबदारी असून, वाहनचालकांसह पादचारी नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
महामार्ग देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
पुणे-नाशिक महामार्गाची आयआरबी कंपनीकडून देखभाल दुरुस्ती होत असते. महामार्ग झाल्यापासून याच आयआरबी कंपनीने टोल वसुलीच्या माध्यमातून हजारो कोटींचा गल्ला जमा केला. या टोल वसुलीच्या नावाखाली महामार्गासाठी झालेला खर्च तसेच भविष्यात या मार्गावरील कामाकरिता येणारा खर्च वसूल केला. मात्र गेल्या दहा वर्षांतील महामार्गची अवस्था बघितली तर व्यवस्थापन कंपनीने एकदाही या महामार्गावर दुरुस्ती वा किरकोळ स्वरूपाचे एका दमडीचे काम केले नाही. नाशिक फाट्यापासून ते औद्योगिक क्षेत्र असलेल्या चाकणपर्यंतचा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
भोसरीत महामार्गाची दुरवस्था
महामार्गांवर अनेक ठिकाणी दुभाजक खंडित झाले आहेत. त्यातून दुचाकीचालक गाडी काढतात. त्यामुळे अपघात घडत आहेत. जय गणेश साम्राज्य चौकापासून मोशी टोलनाक्यापर्यंत या रस्त्यावर अपघातांची संख्या सर्वात जास्त आहे. या अपघातांच्या मालिकेमुळेच महामार्गावरील दुभाजाकांमधील रिफ्लेक्टर नाहीसे झाले आहेत. याबाबत प्रशासनाला विचारणा होऊनही यावर तोडगा निघाला नाही.
पावसाळ्यात महामार्ग पाण्याखाली
मागील वर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे राजगुरूनगर ते भोसरी वाहतूक ठप्प झाली. दोन दिवस महामार्गाचे काम झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. अशा मोठया प्रमाणावर घडलेल्या घटनेने सुद्धा प्रशासनाने फक्त तात्पुरती मलमपट्टी करून घेतली. पण महामार्गावरील सुरक्षिततेचे प्रश्न मात्र आहेत तसेच असून महामार्गावरील प्रवास वाहनधारकांसाठी सुकर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.