पुणे – प्रेमाच्या त्रिकोणातून केलेल्या खूनप्रकरणात मुख्य आरोपीसह पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात एका पोलिसाच्या मुलाला तब्बल बारा वर्षानंतर न्याय मिळाला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे राजेश कावेडिया यांनी काम पाहिले.
प्रवीण दत्तात्रय चौगुले, यशवंत रामचंद्र खामकर, अनिल बहिरू अजगेकर, गोट्या उर्फ देवेंद्र अशोक माने आणि रमेश रंगल्या देवदुर्ग अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. प्रतीक जगताप असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील प्रमोद जगताप हे राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत होते. 2011 मध्ये ही घटना घडली.
खून केल्याप्रकरणी आरोपींवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमांतर्गत दंड आणि शिक्षा सुनावण्यात आली असून, दंडाची एकूण 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम मयत मुलाच्या वडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणात सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि टीडीआर (टोल डिटेल रेकॉर्ड) हे महत्त्वपूर्ण पुरावे ठरले. तसेच सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत न्यायालयानेही निकालात “प्रेमाचा त्रिकोण’ या शब्दाचा आवर्जून उल्लेख केला आहे.
या प्रकरणात एक मुलगी आणि प्रतीकचे प्रेमसंबंध होते. पण, प्रतीकच्या घरी हे संबंध मान्य नव्हते. त्यानंतर ही मुलगी घर सोडून पळाली. एका कॉलसेंटरमध्ये काम करताना तिची दुसऱ्या मुलाशी ओळख झाली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. पण, मुलीने आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यावर आरोपीने प्रतीक याचाच जीव घेतला.