पुणे – महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अहवाल तयार करण्यासाठी 12 जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या गावांमधून प्रत्येक तीन गावांसाठी एक प्रतिनिधी या प्रमाणे 12 जणांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. दरम्यान, या समितीच्या कामकाजासह, प्रतिनिधी नियुक्ती तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बैठक पार पडली.
महापालिकेत ही गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर महापालिकेकडून शासनाकडे गावांसाठी निधी मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून निधी देण्यात आला नाही. गावांमध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, पावसाळी गटारे, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, आरोग्य व अन्य सुविधांची वस्तुस्थिती, आवश्यक कामे, महापालिकेने केलेली निधीची तरतूद आणि राज्य शासनाकडून निधी असा विस्तृत आराखडा तयार करावा तसेच त्यासाठी विशेष समिती नेमावी, अशी मागणी शहरातील आमदारांनी विधानसभेत केली होती. तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, ही समिती नेमण्यात येणार आहे. त्यानुसार, ही समिती समाविष्ट गावांतील सेवा, सुविधांचा अहवाल तयार करणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.