पुणे – जय सियाराम…च्या जयघोषात आणि मंगलमयी उत्साही वातावरणात सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाआरती, भजन केले आणि नंतर प्रसादाचे वाटप केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते, त्याला भाविक वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी श्रीरामाचे भजन करण्यात आले, प्रसाद वाटण्यात आला. याप्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, रोहित टिळक, शेखर कपोते, रमेश अय्यर, पूजा आनंद, रजनी त्रिभुवन, लता राजगुरु, प्रथमेश आबनावे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती केली,असे याप्रसंगी बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.