वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी हे अभियान तालुक्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या गणात जाऊन घेण्यात यावे, अशी मागणी मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निवासी तहसीलदारांकडे केली आहे. मावळ तालुक्यात दिनांक ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे घेण्यात येत आहे.
वडगाव मावळ येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन दिले. कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वडगाव येथे येण्यासाठी प्रवास लांब आहे.
गावातील नागरिकांना अडचणीचे ठरणार आहे. यामध्ये नागरिकांचा प्रवास खर्च व वृद्ध नागरिकांना हे त्रासाचे ठरणार असल्याचे मावळ काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना तालुका अध्यक्ष आशिष ठोंबरे यांनी सांगत तीव्र नाराजी व्यक्त करत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पंचायत समिती गणात न घेतल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.