पुणे – चित्रपट ही स्वतंत्र भाषा आहे. मग मराठी, बंगाली भाषेतील चित्रपट प्रादेशिक आणि हिंदीताल राष्ट्रीय असे कप्पे पाडणे चुकीचे आहे, असे परखड मत प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम घोष यांनी शुक्रवारी व्यक्त केले. उत्तम आशयाची अभिव्यक्ती करणारा मराठी चित्रपट एकाच वेळी प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ठरू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पिफ डिस्टिंग्वीश पुरस्काराने सन्मानित घोष यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आई व्हायोलिनवादक असल्याने लहानपणापासून माझ्यावर संगीताचे संस्कार झाले. मानसिक शांतता आणि सर्वांगीण विकासासाठी मुलाने संगीत शिकले पाहिजे, यासाठी पालक आग्रही होते. पुढे परदेशातून आलेल्या काकांनी लहानपणी मला कॅमेरा दिला आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच नकळत माझा चित्रपट क्षेत्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
घरातला मोठा मुलगा असल्याने आर्थिक भार द्यायला नको या भूमिकेतून पालकांची इच्छा असतानाही मी चित्रपट निर्मिती अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला नाही. मात्र, भरपूर चित्रपट बघून या क्षेत्रातील बारकावे शिकून घेतल्याचे घोष म्हणाले. पुण्यातील रसिक चित्रपट, नाटकांचे जाणकार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांप्रती ते संवदेनशील आहेत, त्यामुळे मला पुण्यात यायला नेहमीच आवडते. मराठी रंगभूमीकडून बंगाली रंगभूमीने प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे दोन्ही भाषांमधील ऋणानुबंध आज कायम आहेत, घोष यांनी सांगितले.
ओटीटीचा चित्रपटगृहांवर परिणाम नाही
घराघरात ओटीटी माध्यम पोहोचल्याने अनेकांना आता चित्रपटगृहे बंद पडणार अशी भीती वाटली. आता ओटीटीचा विरोध मावळला आहे. उलट या नव्या व्यासपीठाने तरुण पिढीतील निर्माते, दिग्दर्शकांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून नवनव्या कलाकृतींची निर्मिती होत असून, चित्रपट क्षेत्राच्या कक्षा विस्तारल्या आहेत. असे असले तरी भविष्यातही चित्रपटगृहे आणि चित्रपट महोत्सव सुरू राहतील, असा विश्वास घोष यांनी व्यक्त केला.