पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सर्व अकृषि विद्यापीठस्तरावरून स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.
या धोरणाची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमांच्या आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी होणार आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि आमूलाग्र व्यापक बदल होत असतांना, त्याविषयीची जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची नितांत गरज आहे. या बदलांचा सर्वाधिक परिणाम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांतून इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. त्या अनुषंगाने, विद्यार्थीकेंद्री शिक्षण धोरणाची मूलभूत तत्त्वे परिणामकारकरित्या प्रत्यक्षात आणावयाची असतील तर ती या वर्षीच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत योग्य रितीने पोहचणे गरजेचे आहे.
राज्यातील महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात प्रवेश नोंदणी होऊन जागा रिक्त राहत आहेत, इयत्ता १२ वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी त्यांच्या विविध अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर जात आहेत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देताना विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून स्थूल नोंदणीप्रमाणे वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठांनी आपल्या परीक्षेत्रातील इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्यापक संपर्क अभियान राबवून विद्यार्थ्यांना या शैक्षणिक बदलांबाबत जागृती करणे आवश्यक आहे.
१५ ते ३१ जानेवारी या कालावधीत अभियान राबवावे लागणार आहे. विद्यापीठस्तरावर समन्वय समितीची स्थापना करावी लागणार आहे. या सर्व अभियानाचे समन्वय संबंधित विभागातील सहसंचालक, उच्च शिक्षण हे करतील व या अभियानांतर्गत विद्यापीठांनी राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल शासनास १० फेब्रुवारीपर्यंत सादर करावा लागणार आहे.
स्कूल कनेक्ट अभियानाची उद्दिष्ट्ये
विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणे, विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती देणे, अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट असलेली कल्पक, व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित संबोधनाविषयी विशेषत्वाने माहिती देणे, मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणे, कुटुंबाला आधार देण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून रोजगाराकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना मुक्त दूरस्थ शिक्षणांच्या संधीविषयी माहिती देणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामिल करुन घेणे, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तीविषयी सविस्तर माहिती देणे, विद्यापीठाच्या विद्यार्थी सहायता कक्षाविषयी माहिती देणे, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधीविषयी माहिती देणे.