पुरंदरवासीयांचा सवाल : चोर सोडून संन्याशाला शिक्षा
दिवे : पुरंदर तालुक्यात सध्या महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने नागरिक वैतागले असून महावितरण आपला कारभार कधी सुधारणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चांबळी विभागातील बोपगाव येथे चार ते पाच दिवस नागरिकांना विजेशिवाय रहावे लागले, यास जबाबदार कोण? जे ग्राहक नियमित विजबिलचा भरणा करतात त्यांना विजेशिवाय राहणे कितपत योग्य आह? पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास वीज चोरी केली जाते त्यांना शिक्षा न करता नियमितपणे विजबिल भरणाऱ्यांना कायम विजखंडितची शिक्षा भोगावी लागत आहे.
दरम्यान, एखाद्या ग्राहकाचे बिल थकले तर तात्काळ वीजजोड खंडित केले जातात; मात्र जो वीज चोरी करतो त्याला शिक्षेविना सोडले जाते, असा दुजाभाव महावितरणकडून का केला जातो, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुरंदर विभागातील नारायणपूर, देवडी, केतकावळे, कुंभोशी आणि चांबळी शाखेत चांबळी, बोपगाव, गराडे, भिवरी या भागातील जमीन विकसित ग्राहकांना व धनदाडग्यांना ताबडतोब वीजजोड दिले जाते तर सर्वसाधारण नागरिकांना वेठीस धरून चकरा मारायला लावत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले असूनही अधिकारी गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संबंधित तक्रारीची ताबडतोब चैकशी करण्यात येईल आणि त्यावर कार्यवाही करण्यात येईल. काही प्रकरणे आमच्याही कानावर आला असून आम्ही त्याची विचारणा करून शहानिशा करीत आहोत.
– उमेश सासणे, उपअभियंता, महावितरण, सासवड