सारोळा – ऑनलाइन प्रणाली सुरू झाली; पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे फेरफार प्रलंबित आहेत. वडिलोपार्जित नावे असल्याने शासकीय योजनेचा फायदा वारसांना प्राप्त होत नाही. तलाठ्यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. प्रभार दिल्याने कामाचा व्याप वाढला आहे, यामुळे फेरफार प्रकरणे प्रलंबित आहेत. तरी कामाच्या पद्धतीत नक्कीच बदल करून महसूल विभागाने प्रत्येक तलाठी कार्यलयात शिबिर आयोजित करून फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी होत आहे.
तलाठी कार्यालयात जमिनीचे फेरफार अनेक वर्षांपासून अडले असल्याने वारसांना नाहक त्रास होत आहे. वडिलोपार्जित शेतीवर वारसांची नावे आहेत. नोंद करण्यासाठी रीतसर दस्तऐवज तलाठी कार्यालयात दिले आहेत; परंतु फेरफार प्रलंबित असल्याने रोज तलाठी कार्यलयात वारसांच्या फेऱ्या सुरू आहेत. सातबारा जुनाच प्राप्त होत असल्याने वारसदार त्रस्त झाले मृत्यू दाखले, सरपंच, पोलीस पाटील यांच्या दाखल्यांची फेरतपासणी करून वारसांना नोंदीचे फेरफार घेण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी, नागरिकांमधून होत आहेत.
तलाठी कार्यालयात शिबिरे घ्यावीत
मंडल अधिकारी यांच्या खांद्यावर अनेक गावे संलग्नित आहेत. अनेक तलाठी कार्यालये आहेत. एकाच वेळी प्रकरणे निकाली काढताना कसरत होणार आहे, यामुळे प्रत्येक तलाठी कार्यालयात शिबिर आयोजित करावे. प्रकरणे निकाली काढताना दस्तऐवजाची न्यायसंगत पडताळणी करण्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वारसांचे फेरफार हे संवेदनशील प्रकरण असल्याने सर्व आवश्यक दस्तऐवज तपावेत. चुकीचे वारसांच्या नावे असणारे फेरफार रद्द करावेत.
अपुऱ्या दस्तऐवजांनमुळे प्रकरणे प्रलंबित आहेत . दरम्यान, अनेक प्रकरणे निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असून लाभार्थ्यांना वेळीच कागदपत्रे पुरविण्यासाठी सूचना दिली जात आहे.परंतु कागदपत्र पूर्तता होत नाही. मुदत संपल्याशिवाय फेरफार पूर्ण करता येत नाही. – मनीषा भूतकर, मंडलाधिकारी, किकवी.