सासवड -महामानवांच्या योगदानातून महाराष्ट्र घडला, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सासवड येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रविवारी (दि. 5) सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (150 वर्षे) सत्यशोधक समाज परिषद आयोजित केले होती. त्यावेळी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे होत्या.
तर प्रमुख उपस्थितीत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव, अभ्यासक प्रा. हरी नरके, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रा. प्रकाश पवार, स्वागताध्यक्ष माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, निमंत्रक रावसाहेब पवार उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले यांनी इंग्लंडच्या राजाला मुंबईत भेटून शेतकऱ्यांसाठी त्याकाळी दुष्काळात निवेदन दिले होते. रोजगारार्थ दुष्काळी कामात ग्रामीण माणसांना खडी फोडण्याचे काम देण्यापेक्षा तलाव, बंधारे बांधण्याचे काम द्या. भूजल वाढेल व जलसंचय वाढून शेतीला भविष्यात पाणी मिळेल, हा त्यांचा दृष्टिकोन त्यावेळी होता.
आमदार संजय जगताप म्हणाले, देशभरातील आताची परिस्थिती पाहता, 150 वर्षांनंतरही महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांची गरज समाजाला आहे त्यातूनच लोकशाही व माणुसकी टिकेल. प्रास्ताविक रावसाहेब पवार यांनी, स्वागत संभाजी झेंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर तर प्राचार्य नंदकुमार सागर यांनी आभार मानले.
“जीवन गौरव’ पुरस्काराने आढाव यांचा सन्मान
डॉ. बाबा आढाव यांना स्व. सदाशिव झेंडे ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार आणि कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केले.
पुरंदर तालुक्यात सुरू झालेला सत्यशोधक परिषद मागील बऱ्याच वर्षांपूर्वी बंद करून ती पुण्यात घ्यावी लागली; परंतु बऱ्याचवर्षांनी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या विचारामुळे पुन्हा पुरंदरला ही परिषद घेण्याचा योग महात्मा फुले यांच्या जन्म भूमीत होत असल्याचे आनंद आहे.
-डॉ. बाबा आढाव, कार्याध्यक्ष महात्मा फुले समता प्रतिष्ठान