राजगुरूनगर-बिबट्याचे जीवघेणे हल्ले व वावर यामुळे भीतीचे वातावरण असून खेड तालुक्यातील पश्चिम पट्यातील विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी पुणे जिल्हा शिवसनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.
पश्चिम भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी धुवोली गावामध्ये अजय चिंतामण जठार यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दीड महिन्यापूर्वी भिवेगाव येथील वनघरे यांचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे, म्हणून रात्रीचा वीजपुरवठा खंडित करू नये.
थ्री फेज वीज रात्रीची न ठेवता दिवसा ठेवण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना पिकांमध्ये दिवसा पाणी देणे शक्य होईल. या गोष्टीची तातडीने विचार करावा, अन्यथा पश्चिम भागातील लोक मोठे जनआंदोलन करतील. त्याला सर्वस्वी जबाबदार महावितरणचे अधिकारी राहतील, असे लेखी निवेदन देण्यात आले.
राजगुरुनगर येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिहर गोठवाड यांना पुणे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भगवान पोखरकर यांनी निवेदन दिले. यावेळी उद्योजक मनोहर पोखरकर, उपतालुका प्रमुख अंबर सावंत, युवा सेना तालुका उपप्रमुख सचिन चौधरी, बाळासाहेब कोरडे, नितीन वाळुंज आदी उपस्थित होते.