इंदापूर -प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसे धैर्याने पुढे जाऊ जायचे, हे राजमाता जिजाऊ यांच्याकडून शिकायला मिळते, एवढे महान कार्यकर्तृत्व राजमाता जिजाऊंचे आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजच्या दिवसाची आठवण ठेवून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा डोळ्यासमोरून हटवून देऊ नका. आपल्या कार्य र्तृत्वसाठी युवा पिढीने दक्ष राहावे, याची शिकवण स्वामी विवेकानंद यांनी दिली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शिवभक्त परिवार आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते, शिवभक्त परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ उद्यानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आजी-माजी सैनिकांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमर शहीद लक्ष्मण संतू डोईफोडे (बोराटवाडी) यांच्या वीरपत्नी सुवर्णा लक्ष्मण डोईफोडे यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जयाजीराव बाजी मोहिते, डॉ. लक्ष्मण आसबे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले.