कोरेगाव भीमा -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवनेरी किल्ल्यावर पायी गेले तर काही उपकार केले नाहीत. चंद्रकांत पाटील जर खरे शिवभक्त असतील तर त्यांनी रायगडावर माझ्यासोबत पाणी न पिता पायी चढवून दाखवावे आणि मग सांगावे, भाजपाच्या नेत्यांकडून राज्यपालांना वाचविण्याचा प्रकार आहे, असा थेट आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला. यावेळी मिटकरी यांनी भाजपाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी या वयात शिवनेरी किल्ला चालत सर केला. त्या राज्यपालांच्या मनात शिवरायांच्या बद्दल अनादर कसा असेल, असा सवाल केला होता. यावर मिटकरी यांनी सडेतोड टीकास्त्र सोडत चंद्रकांत पाटील यांना खुले आव्हान दिले आहे. वढूमध्ये आत्मक्लेश आंदोलनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. मिटकरी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध जी अनास्था आहे. ती राज्यपाल कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांच्या तोंडून जनतेने ऐकली आहे. आज आम्ही इथे शिवप्रेमी म्हणून आलेलो आहोत.
जसे उदयनराजे रायगडावर भाजपचे म्हणून गेलेले नाहीत तर शिवरायांचे एक वंशज म्हणून गेलेले आहेत. आज आम्ही आत्मक्लेश यासाठी करतोय की जर आम्ही आता शांत बसलो तर पुढच्या पिढ्या आम्हाला दोष देतील. चुकून वक्तव्य झाले असेल तर समजू शकतो. मात्र हे वारंवार जाणूनबुजून केले जात आहे. हे लोक इतके निर्लज्ज झाले आहेत की दिल्लीतील कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यांची हकालपट्टी केली नाही. मंगलप्रभात लोढाने देखील राजीनामा दिला नाही. हे जर असेच सुरू राहीले तर तर आमच्या आगामी पिढ्या आम्हाला सोडणार नाहीत.