पुणे -“गांधी परिवार, कॉंग्रेसला त्यागाची मोठी परंपरा आहे. कॉंग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि कॉंग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेतून करत आहेत,’ असे मत माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 18 व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, सप्ताहाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, दीप्ती चवधरी, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, कैलास कदम, दत्ता बहिरट उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले, “कॉंग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर आपण बोलले पाहिजे. हृदयाची आणि प्रेमाची भाषा, संवाद गरजेचा आहे. आज राहुल गांधी तेच करत आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी जो त्याग केला, त्याच वाटेवर राहुल गांधी चालत आहेत.’ तसेच या सप्ताहाच्या निमित्ताने राबविल्या विशेष उपक्रमांचेही आव्हाड यांनी कौतूक केले.
स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “समाजातील सर्व घटकांना जोडणारे विविध कार्यक्रम शहराच्या विविध भागात होत आहेत. अशा अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनियाजींना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न करतो आहोत.’ सूत्रसंचालन अनिता देशमुख, तर आभार वीरेंद्र किराड यांनी मानले.