मंचर -कोकणच्या राजाची म्हणजेच हापूस आंब्याची एन्ट्री मंचर (ता. आंबेगाव) येथे झाल्याने तालुक्यासह शेजारील तालुक्यांतील आंबाप्रेमींना आता आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मंचर येथील नवी मुंबई बाजारसमितीतील मे. मल्हारराव बाबूराव आणि कंपनी यांचे आणि आंब्याचे तीन पिढ्यांचे अतूट नाते आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथे कोकणातून दाखल झालेला हापूस आंब्याचे आगमन आता मंचर येथेही झाले आहे.
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उद्योजक विजय बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर येथे अभिनव आंबा विक्री केंद्राच्या माध्यमातून उद्योजक सतीश बेंडे पाटील आणि सुनील पोखरकर यांच्या अथक प्रयत्नातून चवदार आंबा दाखल झाला आहे.
पुणे ते नाशिक रस्त्यावर सर्वात प्रथम मंचर येथे आंब्याचे आगमन झाले आहे. पुणे नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी कळंब बायपास येथे देखील दुसरी शाखा सुरू करून आंबा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी नैसर्गिकरीत्या आंबा पिकवून ग्राहकांना योग्य दरात विक्री केली जात आहे.
आंबा खरेदीसाठी नाशिक, संगमनेर, अकोले, शिर्डी, राहुरी, कोपरगाव, आळेफाटा, नारायणगाव, शिक्रापूर, राजगुरूनगर, जुन्नर, शिरूर, घोडेगाव, भोसरी येथून ग्राहक येत आहेत. कार्पेटविरहित पिकवलेल्या आंब्याची चवच न्यारी असून एक डझनासाठी प्रतवारीनुसार 500 ते 1 हजार 500 रुपये असा बाजारभाव आहे. लवकरच बाजारभाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, असे व्यापारी सतीश बेंडे पाटील यांनी सांगितले.