उरुळी कांचन/वाल्हे-जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी (दि. 30) पहाट दाट धुक्याची चादर पसरली होती. वातावरणात गारवा वाढल्याने व थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी काही ठिकाणी शेकोट्यासुद्धा पेटविल्या होत्या. तर धुक्यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेगही मंदावला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण पुरंदर तालुक्यासह पूर्व हवेलीतील नागरिकांना सकाळी अनुभवायला मिळाले.
धुक्यामुळे परिसरातला काही काळ पर्यटनाचे स्वरूपण प्राप्त झाले होते; मात्र या धुक्याची तीव्रता इतकी होती की, वाल्ह्यात 15 फुटांच्या समोरील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे पुणे -सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली होती.
महामार्गावरून जाणाऱ्या चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तर समोरील वाहनांचा अंदाज येणे शक्य नसल्याने अनेक प्रवाशांनी आपली स्वतःची वाहने रस्त्याच्या बाजूला उभे करण्यास पसंती दिली व अपघाताचा धोका टाळण्यासाठी धुक्याची चादर कमी होण्याची प्रतीक्षा करत आहेत. तर दौंड-पुणे लोहमार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्या या तब्बल एक तास उशिराने धावत होत्या.
या दाट धुक्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे. शेतातील पिकांवर या धुक्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. या दाट धुक्याची तीव्रता इतकी जास्त आहे. आज पर्यंत काळामध्ये एवढ्या तीव्रतेचा दाट धुके कधीही पसरलेले बघितले नाही. अशी प्रतिक्रिया प्रवासी आणि शेतकरी वर्गातून व्यक्त केली. तसेच या धुक्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली आहे.
दरम्यान, जमिनीलगत आलेले बाष्पाचे कण हवेतील धुलीकणांच्या संपर्कात येऊन हवेत तरंगत राहतात. त्यास धुके म्हणतात. धुक्यात जास्त प्रमाणात बाष्प असते. हे बाष्प अधिक थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे पाण्याच्या कणांत रूपांतर होते. हे कण एकत्र येऊन त्याचे जलबिंदू बनतात. जेव्हा धुके दाट पसरते तेव्हा वनस्पतींच्या पानांच्या थंड पृष्ठभागावर दवबिंदू साठतात. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची वाढ जोमाने होऊ लागली होती. परंतु, गेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात पहाटे धुके पडत असून दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. यामुळे रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. तसेच करपा, आकडी रोग, मावा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही वाढला आहे.
– संभाजी कांचन, शेतकरी उरुळी कांचन