श्रीरामपूर, दि. १ (प्रतिनिधी)- अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून वंचित राहिलेल्या सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने श्रीरामपूर प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आदेश असताना देखील श्रीरामपूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन महसूलचे सर्कल अधिकारी, तलाठी हे व्यवस्थितरित्या पंचनामा करून आपल्याकडे व शासनाकडे शेतकर्यांचे नाव, गाव, पत्ता, बँकेचे अकौंट नंबर, पासबुक झेरॉक्स व्यवस्थित न दिल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
तसेच अनेक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतजमिनीचे सर्कल व तलाठ्याने पंचनामे न करता शेतकर्यांकडूनच फोटो व माहिती मागून घेऊन अर्धवट माहिती महसूल अधिकार्यांनी शासनाकडे पाठविली. अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन सर्व शेतकर्यांशी संवाद साधून खरच महसूल अधिकारी शेतकर्यांच्या बांधवर जाऊन पंचनामा केला की नाही, याची खातरजमा करून दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
निवेदनाची दखल घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकर्यांना त्वरीत अनुदान (मदत) देण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला आहे. याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, सतिश कुदळे, संतोष धुमाळ, डॉक्टर संजय नवथर, भास्कर सरोदे, नितीन जाधव, ऋषभ बर्वे, प्रसाद परे, अमोल साबणे, संदीप विशमबर, सुरेश शिंदे, दीपक सोनवणे, राजू जगताप, सुरेश शिंदे, विकी परदेसी, नितीन खरे, मारुती शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.