पुणे, दि. 8 -पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची झालेली चाळण महापालिकेस चांगलीच महागात पडली आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 193 कोटींची निविदा महापालिका प्रशासनाने काढली असून, यामध्ये शहरातील प्रमुख 50 रस्ते विविध 140 ठिकाणी खरडून काढून पूर्णपणे डांबरीकरण केले जाणार आहे. तर काही सिमेंटचे रस्ते असून, त्यावर 6 इंचाचा नवा थर टाकला जाणार आहे. दरम्यान, हे काम केल्यानंतर पुढील 15 वर्षे रस्ता उखडणार नसल्याचा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे, ही निविदा अल्प मुदतीची असून, पुढील पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली जाणार आहेत
महापालिकेकडून यंदाच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील जवळपास 45 ते 50 कोटींच्या खर्चाची रिसर्फेसिंगची कामे करण्यात आली होती. त्यानंतर समान पाणीपुरवठा योजना, मलःनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे, विद्युत वाहिन्या, मोबाइल केबल यांसह आदी कारणांमुळे रस्त्यांवर वारंवार खोदकाम झाले. त्यानंतर खड्डे सिमेंट कॉंक्रिट किंवा डांबर टाकून बुजविण्यात आले; पण हे काम व्यवस्थित केले नसल्याने रस्ते खचले आहेत. त्या ठिकाणी वारंवार सिमेंट व डांबर टाकल्याने रस्ते समपातळीत नाहीत. त्यातच यावर्षी झालेल्या पावसान हे रस्ते उखडल्याने पुन्हा या रस्त्यांच्या तात्पुरत्या डागडुजीसाठी महापालिकेने आतापर्यंत सुमारे 10 ते 15 कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच शहरातील रस्त्यांवर सुमारे 55 ते 60 कोटींचा खर्च झालेला असताना आता पुन्हा या रस्त्यांसाठी 193 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 300 कोटींच्या निविदा
पहिल्या टप्प्यात 50 रस्ते, 140 ठिकाणी व 140 किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 193 कोटी 47 लाख 11 हजार 686 रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, पुढील 15 दिवसांत निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांची कागदपत्रांची तपासणी व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर लगेच डांबरीकरण सुरू होईल. पुढील 6 महिन्यांत हे सर्व काम संपणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील 193 कोटीचे काम केले जाणार आहे. पुढील 15 दिवसांत उर्वरित 2 टप्प्यांच्या सुमारे 300 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.
193 कोटी रुपयांच्या डांबरीकरणासाठी निविदा काढली आहे. यापैकी 55 कोटी रुपये हे सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यासाठी आहेत. या रस्त्यांवर सहा इंचाचा सिमेंटचा थर टाकला जाईल. त्यामुळे पुढील 15 वर्षे रस्ते चांगले राहतील. ज्या ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत, तेथील भाग खरडून काढून डांबरीकरण केले जाईल.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका