पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) संस्थापक दत्ताजी डिडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत. या परिपत्रकाला अन्य संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.
‘देशातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांसाठी दत्ताजी डिडोळकर हे प्रेरणादायी होते. त्यांनी अनेक सामाजिक आणि अन्य संस्थांची स्थापना केली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ७ ऑगस्ट २०२३ ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थी आणि तरुणांना प्रोत्साहित करण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
“यूजीसीचा निर्णय धक्कादायक आणि चुकीचा पायंडा पाडणारा आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्या विचारधारेसोबत जायचे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असायला हवा. डिडोलकर हे अभाविपला पूजनीय असल्याने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणे हा त्यांचा विषय आहे. मात्र, भाजप आणि सरकारने महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये राजकारण आणून आपले विचार विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. या निर्णयाला युवक काँग्रेसचा प्रखर विरोध आहे.” – अक्षय जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, माध्यम विभाग
“यूजीसीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणे अपेक्षित आहे. मात्र, यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामुळे चुकीचा पायंडा पडत आहे. यूजीसीने हे परिपत्रक रद्द करावे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना, प्रशिक्षण, कार्यशाळा असे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन दिल्यास थोर व्यक्तींच्या कार्याचा सन्मान होईल.”- कल्पेश यादव – सहसचिव युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)