अजित पवार यांचा सवाल : वरिष्ठांचे निर्णय चालतात, तर कनिष्ठाचे का नाही
आळेफाटा – 1999 साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं असं मत वरिष्ठांनी घेतलं. अगदी सहा महिन्यांत आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत सत्तेत गेलो. मग सहा महिन्यात कुठं गेलं, परकीय व्यक्तीचं धोरण? आजवर शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि भाजपचे ही मुख्यमंत्री झाले. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
काही दिवसांपूर्वी जुन्नरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला होता. त्याला पंधरा दिवसही उलटले नाहीत, तोवर अजित पवार यांनीही जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. आजवर स्वतःला तटस्थ म्हणवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनकेंनी या मेळाव्याचे आयोजन केलं होतं. यावेळी पवार बोलत होते.
अजितदादा म्हणाले, 1991ला मी खासदार झालो. कालांतराने मला राजीनामा द्यावा लागला. माझ्या जागी शरद पवार साहेब खासदार झाले, केंद्रात मंत्री झाले. मला राज्यात मंत्री करण्यात आलं. पुढं 1995ला युती सरकार आले, मी फक्त आमदार होतो. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. अगदी सहा महिन्यात आम्ही पुन्हा आमदार झालो आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत सत्तेत गेलो. 2004ला आपली संख्या जास्त असताना मुख्यमंत्री पदाची संधी होती.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आर आर आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यापैकी कोणाला ही मुख्यमंत्री करता आलं असतं, मी काय माझा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो, ते चालतं मग भाजप सोबत सत्तेत गेलो तर काय बिघडलं. वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालतं, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
माझ्यावर खोटे आरोप झाले – अजित पवार
माझ्यावर सत्तर हजार कोटींचा आरोप करण्यात आला. 1960 पासून जलसंपदा विभागात 45 हजार कोटींची खर्च झाला आणि माझ्या काय आरोप झाला, की मी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. धादांत खोटा आरोप होता, हे पुढं सिद्ध झालं. कांद्याचा प्रश्न आपल्या समोर आवासून उभा आहे. याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो. सोलापूरमध्ये ते आले तेव्हा मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री असं तिघांनी मोदींना हा प्रश्न काय आहे, हे सांगितलं आहे.