सहकार नगर (हर्षद कटारिया) – मागील काही दिवसांत तळजाई टेकडीवर आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे टेकडीवरील नैसर्गिक अधिवास व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आगीच्या घटनेत अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास उशीर होत असून त्यावेळेत अनेक झाडे जळून खाक होतात.
मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन झळ पोहोचते, अशी हळहळ वृक्ष प्रेमींनी दै. “प्रभात’च्या माध्यमातून व्यक्त केली होती. तसेच, आग लागताच प्रथम तातडीने वन विभागाने आग शमविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत दैनिक “प्रभात’शी बोलताना राज्य वनमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, तळजाई टेकडीवर आगीच्या घटनेवर खबरदारी उपाय म्हणून व्यवस्था करण्यात येईल. आग लागू नये याबाबतसुद्धा खबरदारी घेतली जाईल. आग लागली तरी ताबडतोब शमविण्यासाठी उपाय योजनेबाबत प्रयत्न केला जाईल.