लोणी काळभोर -राज्यातील अपंग बांधव हलाखीचे जीवन जगत आहे. अपंगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या येणाऱ्या अधिवेशनात सुटल्या नाहीत तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चु कडू यांनी दिला.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे प्रहार संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे शहराध्यक्ष रोहित पवार, माजी जिल्हाध्यक्ष मनोज काळभोर, पुणे जिल्हा संघटक नीरज कडू, प्रहार
शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, आजी, माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कडू म्हणाले, अपंगांसाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत.
मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे योजनांची अंमलबजाणी प्रभावीपणे होत नाही. अपंगांच्या 1995 च्या कायद्याची अंमलबजाणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आपला शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे.
ज्याची सेवा उत्तम आहे त्याला कोणत्याही झेंड्याची व पक्षाची गरज पडत नाही. कोणत्याही कार्यकर्त्यानी कुठल्याही रंगाचा झेंडा हाती न घेता कामाचा झेंडा हाती घ्यावा.