कुरकुंभ -पंधरा दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मळद येथील पाण्याचा तलाव फुटून ओढ्याला पूर आला होता. यात सय्यदवस्ती येथील पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे दळणवळण ठप्प झाले होते. तरुणांना पाण्यातूनच सिलिंडर, पाण्याचे जारची वाहतूक करावी लागत असल्याचे वृत्त “प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. यावर पंचायत समिती विभागाने ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून पुलाचे काम सुरू झाले आहे.
मळदजवळील सय्यदवस्ती येथील ओढ्यावरील पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांची जार, सिलिंडर, दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी गैरसोय होत होती. लोकांना कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये येण्याचा हा मार्ग जवळचा होता. मात्र, पर्यायी मार्ग म्हणून जिरेगावमार्गे कुरकुंभकडे यावे लागायचे. 19 ऑक्टोबरला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार राहुल कुल यांनी या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी पुलाचे काम त्वरित करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. उशिरा का होईना काम सुरू झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
14 ऑक्टोबरला दौंड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मळद येथील तलाव फुटून सय्यदवस्ती येथील ओढ्यावरील पूल वाहून गेला होता. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिकांच्या दळणवळणाची गरज लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विशेष मान्यतेने संबंधित ग्रामपंचायतीला त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या 14 व्या वित्त आयोग निधीतून पुलाचे काम सुरू करण्याबाबत परवानगी दिली असून हे काम सध्या सुरू केले आहे.
– अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी दौंड.