समीर भुजबळ
वाल्हे – राज्य शासन दुधाची अतिरिक्त खरेदी करणार असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भरडून निघालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी ऐन महामारीत आशावादी बनला आहे. दुधाची खरेदी सुरू झाल्याने प्रति लिटर 5 रुपये दरवाढ मिळणार असून शेतकऱ्यांच्या होणारा घाटा काहीअंशी कमी होणार आहे.
गेल्या महिन्यात राज्यभरात विविध पक्ष, सामाजिक संघटना तसेच शेतकरी नेत्यांनी देखील आंदोलने केली होती. अखेर राज्य सरकारने एक महिन्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त दूध खरेदी सुरू केली आहे. आता हे अतिरिक्त दूध येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. प्रतिलिटरला 25 रुपयांचा दर मिळणार आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भाजीपाला तयार असताना, करोनाच्या संकटामुळे बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. तसेच शेतीस जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायालाही मागणीअभावी बाजारभाव मिळत नव्हता.
तर दुसरीकडे पशुखाद्याचे भाव मात्र वाढतच होते, पण पशुधन जगले पाहिजे यासाठी बळीराजा वाढीव भावात पशुखाद्य खरेदी करीत होता. तर दुधाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत, मिनरल वॉटरपेक्षा कमी दराने दुधाची खरेदी जात होती. तर दूध नाशवंत पदार्थ असल्याने ती साठवताही येत नव्हती. त्यातच करोना संकटामध्ये सर्व व्यवसाय बंद असल्याने, उत्पादित दूध कवडीमोलाच्या भावामध्ये देण्याशिवाय पर्याय नव्हताच.
शाश्वत दरासाठी ठोस पावले उचला
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दुधाच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला होता. सध्या राज्य सरकारने शेतकरी हित जोपासले असले तरी शाश्वत दर देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.