बारामती : छत्रपती सहकारी साखर कारखाना जाचकांनी काढला, शेंबेकरांनी माळेगाव सहकारी कारखाना तर मुगुटराव काकडे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना स्थापन केला. खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी व नगरपालिका या संस्था आधीपासूनच आहेत तर शरद पवार यांनी कुठल्या संस्था स्थापन केल्या, असा जोरदार हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर चढविला.
दरम्यान, कन्हेरीतील मारूतीला साक्षी राहून अजित पवार यांनी प्रथमच जोरदार टीकास्त्र सोडल्याने आखाड्यातील लढतीत हल्ले- प्रतिहल्ले होण्याचे संकेत मिळत आहेत.
कन्हेरी येथील हनुमान मंदिरात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी अजित पवार यांनी विरोधी पवार कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला. बारामतीतील सगळ्या संस्था शरद पवार यांनी आणल्या, असा प्रचार विरोधक करीत आहेत. त्यामुळे संस्था नेमक्या कोणी काढल्या हे अजित पवारांनी यांनी स्पष्टपणे सांगितले.
छत्रपती, सोमेश्वर व माळेगाव कारखाना या संस्था दुसऱ्यांनी स्थापन केल्या आहेत. कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था आप्पासाहेब पवार यांनी स्थापन केली. विद्या प्रतिष्ठान ही संस्था शरद पवार यांनी स्थापन केली. मात्र, ती वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. दूध संस्था शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली.
पवार कुटुंबीयावर टीकेची झोेड
बारामती मतदारसंघातील संस्था शरद पवार यांनी स्थापन केल्याचे सांगून लोकांना भावनिक केले जात आहे. दूरदृष्टी ठेवून राजकारण केले जात आहे, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला. यावेळी अजित पवार यांनी श्रीनिवास पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. कन्हेरीतील प्रचार शूुभारंभात प्रथमच अजित पवार यांनी आक्रमकपणे टीका केल्याचे दिसून आले. या टीकेनंतर शरद पवार गटाकडून अद्याप प्रत्युत्तर आले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.