शेतीसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात : तीन जिल्ह्यांना बाधा
पळसदेव – उजनी जलाशयातील पाण्यावर गडद हिरव्या रंगाचा तवंग आल्याने हे पाणी पिण्यास लायक नाही. त्याचबरोबर दुर्गंधी पसरली आहे. शेतीसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुणे, सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यांसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याना देखील उजनीचे पाणी जात असल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या शापित होऊ लागले आहे . धरणातील पाण्यावर काही दशकापासून राजकारणाची उकळी फुटू लागली आहे. राजकर्त्यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली अनेक कंपन्या उभा केल्या. मात्र, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, कुरकुंभ एमआयडीसी भागातील अनेक केमिकल कंपन्यातून निघणारे केमिकलयुक्त पाणी प्रक्रिया न करताच उजनीत सोडून देत आहेत. त्यामुळे उजनीतील धरणाचे पाणी प्रदूषित झाले आहे. जलचर प्रजाती धोक्यात आली आहे.
पाणी शुद्ध करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने तो वाचण्यासाठी कंपन्यानी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचे हात ओले केले. त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याऐवजी ते पाणी साठवून ठेवून पावसाळ्यात नजीकच्या ओढ्या, नाल्यात सोडून दिले जात आहे. हेच प्रदूषित पाणी अनेक वर्षांपासून उजनी धरणात येत असल्याने दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. प्रदूषित पाण्याबाबत अनेक अहवाल शासनाला सादर करण्यात आले आहेत. मात्र, उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत.
आतापर्यंत कुठल्याच नेत्याने ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील नागरिक, शेतकऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. शासकीय पातळीवर यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने उजनीवर अवलंबून असणाऱ्या लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाणी प्रदूषणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निसर्गप्रेमी करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ मांडला
आता उजनीचे पाणी गडद हिरव्या रंगाच्या ऑइलप्रमाणे दिसत आहेत. किनाऱ्यापासून मध्य भागापर्यंत हा हिरवट रंगाचा सायटा पसरलेले दिसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे उजनीतील अनेक मस्त्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. अनेक पान वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. हेच प्रदूषित पाणी शेतीला दिल्यामुळे शेतीचा कस बिघडत आहे. काठावरील शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. उजनी धरणावर अनेक पाणी योजना कार्यान्वित आहेत. अनेक प्रास्तावित आहेत. उजनीचे हे दूषित पाणी पिऊन नागरिकांच्या आतड्यांना सूज, किडनी खराब, होणे, मुतखडा होणे, शरीरावर डाग येणे, अंगाला खाज सुटणे, सतत पोटदुखी आदी आजार जडले आहेत. ही रुग्णसंख्या उजनी काठावरील गावांत सर्वाधिक आहे.