निवृत्तीनगर -शासनाने 15 ऑक्टोबर 2020 पासून गाळपास परवानगी दिली असल्याने त्याचवेळेस विघ्नहर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कारखान्याचे यंदा 10 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ठ असल्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 35व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन ज्येष्ठ संचालक नामदेव थोरात व त्यांच्या पत्नी मंदाकिनी थोरात या उभयतांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) झाले.
सत्यशील शेरकर म्हणाले, या गाळप हंगामासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद व बिगर सभासद यांचा एकूण 24 हजार 350 एकर उसाची नोंद झालेली आहे. कारखान्याने यंदा सुमारे 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. यासाठी 665 टायर बैलगाडी, 298 ट्रॅक्टर टायर, 596 ट्रॅक्टर टोळ्या, 292 ट्रक टोळ्या, 11 ऊस तोडणी यंत्रांचे करार केलेले आहेत. करोना आजाराने कारखान्यातील कामगारांनाही घेरले आहे;
तरी आजारावर योग्य नियंत्रण मिळवत कमीत कमी कामगारांमध्ये कारखान्याची ऑफ सिझनमधील सर्व मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करून कारखाना गाळपासाठी सज्ज ठेवण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमधून ऊस तोडणी कामगार आपल्या तालुक्यामध्ये येणार असल्याने त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन कारखाना गाळप हंगाम पार पाडण्यासाठी मोठ्या आव्हानाचा सामना यावेळी कारखान्याला करावा लागणार आहे.
यावेळी योगिता शेरकर, सर्व संचालक, अधिकारी वर्ग व कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी तर उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.
साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी
एफआरपीमध्ये शंभर रुपयांची वाढ करुन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु दुसऱ्या बाजूला साखरेच्या किमान विक्री किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. साखरेची किमान विक्री किंमत 3100 वरुन 3500 ते 3600 हजार 600 रुपये केल्यास कारखान्याला उत्पन्न व खर्च याचा योग्य मेळ बसविण्यास मदत होईल. केंद्ग शासनाने मागील दोन वर्षांचे साखर निर्यातीसाठी जाहिर केलेले अनुदान अद्याप कारखान्यांना दिलेले नाही. आपल्या कारखान्याचे सुमारे 49 कोटी साखर निर्यात अनुदान अद्याप कारखान्यास प्राप्त झालेले नाही.