सातारा जिल्ह्यात पोलिसांच्या मानवंदनेत माऊलींचे स्वागत
प्रशांत ढावरे
लोणंद – हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात रविवारी (दि. 18) दुपारी दीड वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत टाळ-मृदंगाच्या साथीत मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात हैबतबाबांच्या भूमीत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.
येथे पोलीस मानवंदना देत माऊलींचे दिमाखदार स्वागत केले. तर सायंकाळी सहा वाजता पालखी सोहाळा लोणंद येथील पालखी तळावर विश्रांतीसाठी विसावला.
माऊलींच्या रथाचे स्वागत पशशरा नदीकाठावरील पाडेगाव येथे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आल्यानंतर पालखी सोहळा पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद शहरात दाखल झाला
पालखी सोहळा तानाजी चौकात पोहचल्यानंतर माऊलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेऊन लोणंदकर ग्रामस्थांनी वाजतगाजत साडेपाच वाजण्याच्या सुमारास पालखीतळावर पोहोचवली. पालखी तळावर सर्व पालख्या गोलाकार उभ्या केल्यानंतर चोपदारांनी दंड उंचावल्यानंतर सर्व दिंड्या उभ्या राहील्या यानंतर वारकऱ्यांना सूचना देण्यात आल्यानंतर सायंकाळची समाज आरती होऊन लोणंद मुक्कामी पालखी सोहळा विसावला. यानंतर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.