शिरूर लोकसभेसाठी राजकीय समीकरणे बदलणार? : दोन तालुक्यांत प्रबळ नेत्यांची कसोटी पणाला
राजेंद्र वारघडे
पाबळ – राष्ट्रवादीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजनीतीचा अंदाज आजही भलाभल्यांना चक्रावणारा ठरला आहे. तरीही सर्वच पक्ष शरद पवार यांच्याकडे आशेने पाहत असतात. यामागे त्यांचे उपद्रव मूल्य मौल्यवान असल्यामुळेच उद्याच्या राजकारणात शिरूर लोकसभा मतदारसंघ तसेच शिरूर व आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांना 2024 ची निवडणूक सहज सोपी जाणार नसल्याची चर्चा आहे. शिरूर लोकसभा, शिरूर विधानसभा आणि शिरूर-आंबेगाव विधानसभा या तीनही मतदारसंघात येत्या निवडणुकांमध्ये प्रखर विरोधाभास उमेदवारांना आणि मतदारांना दिसून येणार आहे. परिणामी हीच बाब प्रस्थापित उमेदवारांसाठी मात्र कसोटीची ठरणार आहे.
राज्याच्या राजकारणात न भूतो भविष्यती अशी राजकीय उलथापालथ झाली. त्यातून भाजप व मनसे व्यतिरिक्त प्रत्येक प्रमुख पक्षात एक नवीन गट निर्माण झाला. तर काही पक्षात नवीन गट उदयाला येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षात निर्माण झालेला व होऊ घातलेला गट आणि त्यातून निर्माण होणारी कटुता ही निवडणुकामधील मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरणार आहे. यामध्ये प्रस्थापित, आयात आणि काठावरचे उमेदवार आपापले घोडे पुढे दामटणार असल्याने प्रस्थापितांची मात्र भंबेरी उडणार असल्याची चर्चा आहे.
ऑगस्टमधील दुसऱ्या पंधरवड्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर फक्त निवडणुका जाहीर होणे हीच बाब पुढील संघर्षाची ठिणगी टाकण्यास कारणीभूत ठरणार आहे. यापैकी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी आमदार विलास लांडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम हे खासदारकी लढवलेले उमेदवार पुन्हा रणांगणात शड्डू ठोकण्याची दाट शक्यता आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात आमदार अशोक पवार, भाजपच्या जयश्रीताई पलांडे, भाजपचे प्रदीप कंद, पैलवान बांदल, राजेंद्र गावडे, ऋषिराज पवार, पाचर्णे, संजय पाचंगे, रवींद्र काळे यांच्यासह बदललेल्या राजकारणाचा फायदा घेण्यासाठी व शिरूरची आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण पुढे येण्याची शक्यता आहे.
शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची 35 वर्षे एकहाती सत्ता आहे. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आंबेगाव आणि आंबेगावला जोडलेल्या तीन जिल्हा परिषद गटातील भूमिका निर्णायक ठरणार आहे. यासाठी देवदत्त निकम हे नशीब आजमावून पाहण्याची दाट शक्यता आहे. तीनही मतदारसंघात ज्या राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. त्या पक्षातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फूट पडली असली तरी शरद पवार यांची येवला (नाशिक) येथे झालेली सभा आणि आणि भविष्यात होणारा राज्यव्यापी दौरा या फुटीर गटातील अनेकांचे भवितव्य ठरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या घोषणेनंतर वारे कसे वाहणार, याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीमध्ये पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता शरद पवार यांच्या होऊ घातलेल्या दौऱ्यामुळे मावळल्यानेच तीनही मतदारसंघात मतदार व पवार यांच्या भूमिकेला आता वेगळे महत्त्व आल्याने भावी खासदार आणि आमदारांचे भवितव्य तूर्तास तरी टांगणीला असल्याची चर्चा आहे