जेजुरी– उमाजी राजे नाईक यांच्या काळात लेखन करण्यासाठी लेखक नव्हते, कथाकार नव्हते त्यांचा इतिहास ब्रिटीश अधिकार्याने लिहिला. ब्रिटीशांच्या विरोधात त्यांनी पहिले बंड केले म्हणून हेच आद्य क्रांती कारक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत आद्य क्रांती कारक उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या 192 व्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन व सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडावर जावून उमाजी नाईक यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले.
जयंत पाटील म्हणाले की, राज्याची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे आमदार गोळीबार करतात. ही गुंडशाही आहे. या आमदारावर अद्याप कारवाई झाली नाही. कारण ते भाजपचे जावई आहेत. जर सत्तेतील आमदाराच गोळीबार करीत असतील तर जनतेची सुरक्षा कशी राहील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपण संसदेत आवाज उठविणार आहे. तसेच उमाजी राजे नाईक यांच्या बलिदानदिना निमित्त सर्व रामोशी समाज बांधव, वंचित भटके समाजाचे प्रश्न आपण पुढाकार घेवून सोडविणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी महानंदा दूधचे अध्यक्ष रणजीतसिह देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे,दतात्रय चव्हाण, हेमंतकुमार माहुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, कात्रज दूधसंघाचे संचालक तानाजी जगताप, जयदीप बारभाई आदी उपस्थित होते.
भारतरत्न जाहीर करा
आद्य क्रांतीकारक उमाजी राजे नाईक यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी केली.