राजगुरूनगर – बाजार समितीने व्यापारी आडते यांच्या संरक्षणाबरोबर शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करावे. शेतकऱ्यांचे हित आतापर्यंत जोपासले आहे. बाजार समितीमधील शेतकऱ्याची पिळवणूक थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत. उचलेगिरी करणाऱ्यांना थारा देऊ नये असे आवाहन राज्य बाजार समितीचे अध्यक्ष तथा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरूनगर येथे केले.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरूनगर येथील बाजारात (दि. 9) हुतात्मा राजगुरू सोयाबीन खरेदी विक्री केंद्राची सुरुवात केली असून त्याचे उद्घाटन मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक चंद्रकांत इंगवले होते.
याप्रसंगी सभापती विनायक घुमटकर, उपसभापती धारू गवारी, सचिव बाळासाहे धन्द्रे, जि. प. माजी सदस्य अरुण चांभारे, अशोक शेंडे, शांताराम चव्हाण, माजी सभापती सुरेश शिंदे, बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे, बाळ ठाकूर, राम गोरे, अमर कांबळे, शांताराम भोसले, पांडुरंग बनकर, विठ्ठल वनघरे, धैर्यशील पानसरे, सयाजी मोहिते, विलास कातोरे, नवनाथ होले उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले, शेतीमालाला स्पर्धा असली तरी शेतकऱ्यांचे हित पाहणाऱ्या बाजार समित्या पुढील काळातील स्पर्धेत टिकू शकतील. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बाजार समित्या धोक्यात आल्या आहेत. शेतकरी आणि व्यापारी यांना सुविधा निर्माण कराव्यात. तरच शेतकरी येतील. शेतकरी व्यापारी यांच्यात समन्वय ठेवावा. बाजार समित्यांमधील दादागिरी मोडून काढण्यासाठी मी समितीच्या संचालकांसोबत कायम राहील.
घुमटकर म्हणाले, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानुसार आमदार मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. प्रतवारीनुसार जास्त भाव कसा देता येईल, याकडे प्रयत्न राहणार आहेत. चाकण येथेही सोयाबीन खरेदी विक्री लवकरच सुरू केली जाईल. यावेळी व्यापारी सुशील सिंगवी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळासाहेब धंद्रे यांनी केले. उपसभापती चंद्रकांत इंगवले यांनी आभार मानले.
गेली 15 वर्षे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. राज्य बाजार समितीचा अध्यक्ष असल्याने करता येईल ते केले जाणार आहे. मी पुन्हा निवडणूक लढविणार नाही त्यामुळे आताच बाजार समितीची सर्व कामे मार्गी लावणार आहे.
-दिलीप मोहिते पाटील, अध्यक्ष, राज्य बाजार समिती.