खेडमध्ये वाटप करताना शिक्षकांना डोकेदुखी : 2 लाख 45 हजार पुस्तके आली
राजगुरूनगर – शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा बुधवार (दि. 15) पासून होणार असल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय मुलांना नवीन पाठ्यपुस्तकांचा संच वाटप करण्यात येणार आहेत; मात्र खेड तालुक्यात 2 लाख 45 हजार 270 पुस्तके आली आहेत. असे असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थी पटसंख्येच्या मागणीनुसार 20 टक्के पुस्तकांचे संच कमी आल्यामुळे शिक्षकांची पुस्तकवाटप करताना डोकेदुखी ठरणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रायोगिक तत्वावर इयत्ता पहिलीच्या मुलांचे दप्तराचे ओझे कमी होणार असल्याचे संकेत असून राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याप्रमाणे आता पहिलीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयानुरुप एकच संच पुस्तिका तयार करुन अभ्यासक्रमानुसार तीन महिन्यांचा चाचणी परीक्षा नुसार विषयांचा टॉपिक टाकून पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांना सर्व अंतर्भूत विषयाची मांडणी करुन चार संचिका तयार केल्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांना दर तीन महिन्यानंतर पुस्तिका संच बदलले जाणार आहेत. आता एकच पुस्तिका असल्याने पुस्तकांचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.
खेड तालुक्यातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तकांचे केंद्र शाळा निहाय वाकी बुद्रुक येथील माध्यमिक शाळेतून वितरीत करण्यात सुरुवात झाली आहे. केंद्रातंर्गत शाळानिहाय शनिवारपर्यंत विद्यार्थी संख्येनुसार पुस्तक संचाचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे यांनी दिली.
63 शाळांमध्ये संचाचे वाटप होणार
खेड तालुक्यात जिल्हा परीषदेच्या 1 ली ते 4 थी आणि 1ली ते 7 वी पर्यत मिळुन 402 शाळा तर माध्यमिकच्या 5 ते 8 वी पर्यंतच्या अनुदानित 63 शाळांमिळून 37 हजार 433 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचाचे वाटप केले जाणार आहे.