नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील वाढती बिबटसंख्या जुन्नरकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याला सुरक्षित लपण निर्माण झाले आहे.
पर्यायाने बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. दिवस रात्र बिबट्यांचा वावर दिसू लागल्याने शेतकरी, मेंढपाळ व स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी टेंटचा वापर करणे हा अतिशय स्तुत्य उपाय सुचविला आहे. त्यांनी प्रत्येक वनपरीक्षेत्रातील वनरक्षक, वनपाल यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मेंढपाळ व मजूरांना टेंट लावून सुरक्षित उपाय कसे करावे याबाबत जागृती करण्याचे आवाहन व सूचना दिल्या आहेत.
जुन्नर तालुक्यात मेंढपाळांची संख्या पाहता त्यांच्या डोक्यावर राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे छत नसते. शेतातच मोकळ्या जागेत राहावे लागत असल्याने त्यांच्या पशुधनावर व स्वतःवर बिबट्याचे होणारे हल्ले थांबविण्यासाठी उपवनसंरक्षक जुन्नर वनविभागाचे अमोल सातपुते यांनी टेंटच्या माध्यमातून मेंढपाळांच्या डोक्यावर सुरक्षित निर्माण केले आहे.जेणेकरून सहज सोबत घेऊन जाणे व शेतात टेंट उभा करणे सोयीचे असून सुरक्षितता घेतली जाते.
शेतकरी आपल्या शेतातील मातीची गुणवत्ता वाढावी व शेतात लेंडीखतामुळे उत्तम भाजीपाल्याची लागवड करून आर्थिक उत्पादनात भर पडावी म्हणून मेंढपाळांना शेतात मेंढ्या बसविण्यासाठी आग्रही असतात. मेंढ्यांच्या सुरक्षेसाठी मेंढपाळ मेंढ्यांना चारही बाजूंनी वाघुर (जाळी) लावतात परंतु स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेत नाही.
बिबट्या मेंढ्यांच्या चारही बाजूंनी फिरून पाहतो; परंतु जाळीमुळे बिबट्याला मेंढ्यावर हल्ला करता येत नाही. याउलट सुरक्षेविना उघड्यावर झोपलेल्या मेंढपाळावर झडप घालणे बिबट्याला सहज सोपे होते. यासाठी वनविभाग जुन्नरचे अधिकारी व कर्मचार्यांनी टेंट लावणे बाबतची जनजागृती सुरू केली मेंढपाळ व मजुरांनी निर्णयाचे स्वागत केले असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.