केंदूर- करोना महामारीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरीब जनतेच्या आरोग्याची जबाबदारी झटकली आणि “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं मरण स्वस्त केलं. अशा भावना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केल्या. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 300 रुग्णांची आरोग्य तपासणी करून नेत्र चिकित्सा, गरजूंना चष्मे, औषधे व 700 औषधी वनस्पतींचे वाटप यावेळी करण्यात आले. याप्रसंगी भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, गणेश दगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धर्मेंद्र खंडारे, सुदर्शन चौधरी, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, अमोल शिवले, प्रवीण काळभोर, पंडित भुजबळ, राजाभाऊ तांबे, बाळासाहेब चव्हाण, गणेश कुटे, संदीप सातव, शाम गावडे, राजेंद्र ढमढेरे, काकासाहेब खळदकर, संतोष करपे, रवींद्र कंद उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून शिक्रापूर येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, रोहित खैरे, बाबासाहेब दरेकर यांनी आरोग्य शिबिर आणि औषधी वनस्पतींचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राज्यातील बारा लाख करोनाबाधित रुग्णांपैकी फक्त 9 हजार लोकांनाच सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला. मुख्यमंत्री घरातच क्वारंटाइन आहेत. ते मातोश्री सोडत नाहीत. उपमुख्यमंत्री फक्त पुणे आणि बारामतीमध्ये फिरत आहेत. राज्यातील इतर मंत्रीदेखील फिरत नाहीत.
आघाडी सरकारने राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, असेही भेगडे म्हणाले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सरकारवर सडकून टीका केली. नितीन गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. जयेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. रोहीत खैरे यांनी आभार मानले.