राजगुरुनगर – खेड तालुक्यात रब्बी हंगामातील बटाटा काढणीला वेग आला आहे. बटाटा काढणीला वेग आल्याने मजुर टंचाई निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यात भिमा, भामा, इंद्रायणी नदी तसेच नदीपात्रातील बंधारे आणि चास कमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर आधारीत बागायती क्षेत्र वाढले आहे. रब्बी हंगामात कांदा, बटाटा, टोमॅटो तसेच भाजीपाला पिके शेतकरी घेतात. खेडमध्ये रब्बी हंगामात 12 हजार हेक्टरवर बटाट्याची लागवड केली जाते.
बटाटा पिकाचा भांडवली खर्च मोठा असतो; मात्र उत्पन्न चांगले मिळाले, बाजारभाव स्थिर राहिला तर शेतकर्यांना हमखास लाभ मिळतो. अवघ्या अडीच तीन महिन्यांत हे पीक हातात येते. त्यामुळे खर्चिक असले तरी हे पिक शेतकर्यांना सोयीचे वाटते.या हंगामातील बटाट्याचे उत्पन्न चांगले असून बाजारभाव 1200 ते 1500 रुपये क्विंटल प्रमाणे मिळत आहे.
आम्ही अर्धा एकर क्षेत्रात बटाटा पीक घेतले.59 कीलोचे 8 गोणी बटाटा बियाणे, खते, औषधे आणि मजुरी मिळुन 30 हजार रुपये खर्च आला. उत्पादन चांगले मिळाले आहे. सध्याच्या बाजार भावा नुसार आम्हाला 70 ते 75 हजार रुपये मिळतील.
– बाळासाहेब कोहिनकर, शेतकरी, कोहिनकरवाडी