प्रमोद ठोंबरे
बारामती – मार्चपासून सुरू झालेल्या “लॉकडाऊन’मुळे बारामतीतील सुमारे एक हजार रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात सहा महिन्यांत सुमारे 27 लाख 90 हजार रुपयांची आर्थिक झळ बसली आहे. लॉकडाऊननंतर चालकांची उपासमार होत असल्यामुळे त्यांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.
बारामती शहराला इंदापूर, दौंड, पुरंदर कनेक्ट आहेत. तसेच तालुक्यातील सुमारे 100 गावांतील नागरिकांचा शासकीय कार्यालयाशी राबता आहे. तहसील, कृषी, पंचायत समिती, औद्योगिक वसाहतीमध्ये ये- जा करणाऱ्या नागरिक आणि कामगारांची संख्या सुमारे 20 हजारांवर आहे. त्यामुळे शहरातील रिक्षा व्यवसायाला बरकत आली होती, मात्र, गेल्या तीन वर्षांत आर्थिक मंदीमुळे व्यवसायावर दूरगामी परिणाम झाले होते. त्यातच मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर रिक्षाचालकांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. बारामती शहरात जवळपास 650 तीन चाकी पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या रिक्षा आहेत.
तसेच 280 सहा आसनी रिक्षा आहेत. या व्यवसायावर 1000 हून अधिक कुटुंबे अवलंबून आहेत. या व्यवसायातून महिन्याकाठी सरासरी 4 लाख 65 हजार रुपयांची उलाढाल होते. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत रिक्षाचालकांनी चार महिने अक्षरशा बसून काढले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
दहा हजारांची मदत करा
रिक्षाचालक अनेक महिन्यांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जमा करावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षाचालक पाठपुरवा करणार आहेत.