मंचर -आंबेगाव तालुक्यात गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे बटाटा लागवड खोळंबली आहे.पाऊस उघडल्यानंतर बटाटा लागवडीला वेग येईल, अशी माहिती मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
मागील आठ ते दहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी बटाटा लागवड थांबवली असून, लागवड केलेले बटाटे वाहून गेले आहेत, तर उरलेले सडणार आहेत. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे पुढील 8 ते 10 दिवस बटाटा लागवड करता येणार नसल्याने बटाटा वाणाच्या मागणीत घट झाली आहे.
याबरोबरच बटाट्याचे वाण महाग असल्याने बटाट्याची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. सध्या 50 ते 70 रुपये किलो दराने बटाट्याचे वाण शेतकरी खरेदी करत आहेत. अतिपावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने भांडवलाअभावी बटाट्याची लागवड कमी झाले आहे.
पंजाब येथून येणाऱ्या बटाट्याच्या वाणाला 50 ते 70 रुपये किलो बाजारभाव आहे, तर गुजरातमधून येणाऱ्या बटाट्याच्या वाणास 30 ते 50 रुपये बाजारभाव आहे. पंजाब येथील बियाणे दर्जेदार असल्याने या वाणास मागणी आहे; परंतु कमी भांडवल असणारे शेतकरी गुजरातचे वाण लागवड करतात. यावर्षी बटाटा वाणाची कमतरता आहे.
वाणाच्या बाजारभावात वाढ झाल्याने बटाट्याची लागवड कमी होणार आहे. नेहमी मोठी लागवड होणाऱ्या भागातही बटाट्याची लागवड कमी झाली आहे. परिणामी यावर्षी बटाट्याला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या बाजारात खाण्याचा बटाटा 35 ते 40 रुपये दराने विकला जात आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे चांगली थंडी राहणार असून बटाट्यासाठी वातावरण पोषक राहणार आहे.
-संजय मोरे, बटाटा व्यापारी, मंचर