चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
पुणे/कोथरूड – अतिवृष्टी झालेल्या भागात मुख्यमंत्र्यांनी इतरांसारखा प्रवास करून उपयोग नाही. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर जागेवरच शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठोस निर्णय जाहीर करून त्याची अंमलबजावणी करून घेणे अपेक्षित आहे. ते राहिले बाजूला “अजूनही अतिवृष्टी होऊ शकते’, असे भाकित करत मी जरा पाहतो असे आश्वासन देतात. मात्र, जे झालं त्याबद्दल बोला ना.., असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्र्यांना लगावला.
पुण्यातील कोथरूड येथे एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बारामती दौऱ्याबाबत विचारणा केली असता, देवेंद्र फडणवीस यांनी बारामती भागात दौरा केला. तो नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचे दु:ख समजवून घेण्यासाठी. हा दौरा कोणाला कोंडीत पकडण्याचा विषय नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवू देण्याचा विषय आहे. ज्येष्ठ नते शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे.
केंद्रात मंत्री असताना त्यांनी अनेक विषयांना न्याय मिळवून दिला, अशा व्यक्तिमत्त्वाला वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते, त्यांना प्रोटेक्ट करावे लागते, हे बरोबर नाही. “मी या वयात बाहेर पडतो, तू पड़ की रे बाहेर’, असे पवार मनामध्ये म्हणत असतील, असे पाटील यांनी सांगितले.
… ते “बोनस समजावं
मराठा आरक्षण प्रश्न केंद्राने सोडवावा, करोनाच्या परिस्थिबाबत केंद्राने मदत करावी, आता अतिवृष्टी झाली केंद्राने मदत जाहीर करावी, प्रत्येकवेळी केंद्रावर अवलंबून का? असा प्रश्न उपस्थित करत अतिवृष्टी, दुष्काळ परिस्थिती असल्यावर राज्य सरकारने सुरुवातीला मदत जाहीर करावी. त्यानंतर, नुकसानीचा अंदाज घेऊन केंद्राकडे निवेदन पाठवायचे असते. ते निवेदन बघून केंद्र सरकार अनुदान देते. त्यामुळे आधी राज्य सरकारची तयारी असायला पाहिजे. केंद्र सरकारकडून जे मिळेल ते “बोनस समजावं.’
भाजपचे नेते एकनाथ खडसे आता जरी नाराज असले तरी त्यांच्याबरोबर बोलणं सुरू आहे. त्यांची नाराजी दूर होईल. ते कुठेही जाणार नाही.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा