एकाचा मृत्यू : तिघे गंभीर जखमी
वाल्हे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून आळंदीकडे मार्गस्थ झालेले श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा व श्री पांडुरंग पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटपून रविवारी (दि. 3) पुढील मुक्कामाकडे मार्गस्थ होत असताना दौंडज खिंड (ता.पुरंदर) परिसरात पहाटे साडेचार वाजता या वारीतील चार वारकर्यांना पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने, या अपघातात एका तरुण वारकर्यांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी पिकअप चालकास अटक केली आहे.
कृष्णा नागोराव गरुड (वय 23, रा. मटकर आळा ता. जिल्हा परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सिधेशोर प्रभाकर बोबडे (वय 23), रितेश राजाराम ब्रह्मेे (वय 18, दोघे रा. बोबडे टाकली ता. जि. परभणी), चक्रधर कोपलवर (वय 28 रा. साडेगाव, ता. जि. परभणी) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या जखमी रुग्णांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालय दाखल केले आहे.
पंढरपूरहुन आळंदी कडे वारकरी दिंडी जात असताना, पहाटे साडे चार वाजता दौंडज खिंडीत काही वारकरी टँकरच्या नळावर हात पाय धुत असताना मागून असलेल्या पिकअप जीप ने चार वारकर्यांना धडक दिली. दरम्यान, अपघातातील पिकअप वाहन (एमएच 14 जीयु 5045) पिकअप चालक निलेश बाळासाहेब जगताप वय (35 रा. कोथळे ता.पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.