डिंभेग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आठ पुनर्वसित गावे आक्रमक
मंचर : 40 वर्षांनंतर डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागरच्या पाणलोट क्षेत्रातील पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न आजही सुटलेले नाही. त्यामुळे पुनर्वसन धरणग्रस्ताचे जमीन आणि नागरी सुविधा मिळत नसल्याने पुनर्वसन गावांच्या समस्या सुटल्या नाहीतर डिंभे धरणग्रस्त गावे येणार्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय बिरसा ब्रिगेड व आंबेगावचा 8 पुनर्वसन गावांनी घेतला आहे.
निरगुडसर कोलतावडे येथे राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लायन हार्टेड होन्या भागूजी केंगले, नाग्या कातकरी, राया ठाकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या मेळाव्यात बिरसा ब्रिगेड व आंबेगावचा 8 पुनर्वसन गावे एकत्र आली व वरील निर्णय घेतला.यावेळी ढोल ताशाच्या गजरात, लेझिम पथक, टिपरी पथक यांच्यासह निरगुडसर गावातून आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेंची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या योगिनी खानविलकर, दामोदर ढवळे, मच्छिंद्र लोहकरे, अशोक किर्वे, निलेश किर्वे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जालिंदर किरवे, तुषार किरवे, विनेश भांगे, भाऊ शेळके, नवनाथ कोरके, चरण वाळकोळी यांनी केले होते.
ते शासनाला नीट सांगता येणार नाही
धरणग्रस्त गावांना फक्त जमीनी ताब्यात दिल्या आहेत; परंतु पाणी, शेतात जाण्यासाठी रस्ता या मुलभूत सोयी सुविधांपासून आजही वंचीत आहे. त्यामुळे या आठ पुनर्वसीत गांवाचा पुनर्वसन फक्त नावालाच झाले आहे. पुनर्वसन झालेला आदिवासी बांधव पुनर्वसन केलेल्या ठिकाणी लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा देऊ असे शासनाने सांगितले होते; पण आतापर्यंत किती सुविधा दिल्या ते आज शासनाला सुद्धा नीट सांगता येणार नाही.
पुनर्वसन करताना पुनर्वसन गावांमध्ये जे अंतर्गत रस्ते झाले ते होऊन 40 वर्षे झाली पण तेच रस्ते आजही लोक वापरत आहेत. तेथे गेल्या 30 ते 40 वर्षांत नवा रस्ता झाला नाही.
– आनंद मोहरे, अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड, आंबेगाव तालुका
पुनर्वसनच्या बांधवांकडं येथील प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधिनी लक्ष न दिल्याने 40 वर्ष उलटून सुद्धा त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. ते जर शांततेच्या मार्गाने सुटणार नसतील तर बिरसा ब्रिगेड पुनर्वसन गावच्या सर्व बांधवांना घेऊन कालव्यामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही.
– प्रवीण बुधाजी पारधी, अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड, पुणे जिल्हा