पेरणीची लगबग : जंगम कुटुंबीयाकडून शेती
हिरडस मावळ : रायरेश्वर (ता. भोर) येथे पठारावर सुमारे 45 जंगम कुटुंब वास्तव्यास आहेत. ही कुटुंबे आपली उपजीविका भागवण्यासाठी भात पिकांचे उत्पादन घेतात. मात्र, पावसावरील् भात पीक काढून झाल्यावर ते पारंपरिक पद्धतीने चालत आलेली नैसर्गिक सेंद्रिय गव्हाची शेतीही मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.
सध्या पठारावरील भात पीक काढणी अंतिम टप्प्यात आहे. भात पीक काढून झाली आहेत. तेथे बैल व मनुष्याद्वारे मशागत करून गव्हाच्या पिकासाठी जमीन तयार करुन सध्या रायरेश्वर पठारावर गहू पेरणीला सुरुवात केली आहे. पेरणीसाठीचे बियाणेसुध्दा
बाजारातून न आणता पारंपरिक पध्दतीने पिकत असलेल्या शेतीतून हे बियाणे ग्रामस्थ आजतागायत वापरत आहेत. ही गहू शेती पूर्णपणे पडत असलेले दव आणि थंडीच्या गारव्यावर अवलंबून असते. शेतीस फक्त शेणखत वापरले जाते. अशा नैसर्गिक व पारंपारिक करीत असलेल्या गहू शेतीबद्दल ग्रामस्थ समाधानी असल्याचे दिसून येत आहे.
पिकाच्या उत्पादनावरच येथील ग्रामस्थांचे वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. गव्हाच्या शेतीला कोणत्याही प्रकारचे पाणी दिले जात नाही, कोणत्याही रासायनिक खतांचा, औषधांचा वापर केला जात नाही. ग्रामस्थांना कोणतेही यांत्रिक अवजारे गडावर नेणे शक्य नसल्याने पारंपरिक पद्धतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शेती केली जाते. बैलांचा वापर करून शेतीची मशागत होते. सेंद्रीय गव्हाला चांगली मागणी असून 40 ते 45 रुपये प्रतिकिलो दर मिळतो, असे रायरेश्वर ग्रामस्थ सखाराम जंगम यांनी सांगितले.