सोरतापवाडी – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता लक्ष थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागले असून, या निवडणुकीत सभासद असणाऱ्या मध्यमवयीन व सर्व साधारण सभासदांना संधी मिळावी, अशी मागणी पेठ गावचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक सुजित चौधरी यांनी केली आहे.
एकेकाळी हवेली तालुक्याचे वैभव असलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमितेमुळे कोट्यवधी रुपयांचे कर्ज असल्यामुळे 2011 रोजी बंद करण्यात आला होता. तेव्हापासन 12 वर्षे झाली कामगारांना पगार नाही की शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळाले नाही. हा कारखाना रसातळाला गेला असून सर्व राजकीय पक्ष फक्त निवडणूकीसाठी याचा उपयोग करतात.
सभासदांना फक्त आश्वासनाचे गाजर दाखवत आहे. सभासदांच्या स्वप्नावर पाणी पडले असून येथील सभासद देशोधडीला लागला आहे. स्व. आण्णासाहेब मगर व स्व. मणिभाई देसाई यांच्या स्वप्नांतील व पूर्व हवेलीचा मानबिंदू असणारा यशवंत सहकारी कारखाना पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आता शेवटच्या घटका मोजत आहे.
2023 साल सुरू झाले आणि यशवंत कारखाना चालू करण्याची चर्चा रंगु लागली. एप्रिल महिन्यात झालेल्या कारखान्यावरील विशेष सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा निर्णय व त्यासाठी खर्चाची तरतूद करण्याचा ठराव सभेमध्ये घेण्यात आला. सभासदांनी जमा केलेले तीस लाख रुपयांचे धनादेश तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजय गोंदे यांच्याकडे सभासदांनी सुपुर्द केले. त्यामुळे लवकरच निवडणूक होणार असल्याची आशा सभासद व भावी संचालकांना लागली.
काही भावी संचालक रोज पॅनल प्रमुखांच्या घरी पॅनलमध्ये घेण्यासाठी चकरा मारत असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होण्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. पॅनलची चर्चा रंग धरु लागली आहे तशीच चर्चा दुसरी चालू असुन जर निवडणूक घेतली गेली तर सर्व सामान्य घरातील 35 ते 50 या वयातील नवोदित व सहकारामध्ये काम केलेल्या व साखर कारखानदारीशी संबंधित शेतकरी सभासदांना यामध्ये संधी देण्याची मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच प्रस्थापितांना संधी देताना नवीन संचालक वर्गाचा विचार करण्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे.
बाजार समितीवर अनेक युवकांना कार्य करण्यासाठी संधी मिळाली असुन तशीच संधी आत्ता यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळावी व धनशक्तीचा वापर करून निवडून येऊन सहकारी संस्था पुन्हा मागील दिवस पुढे न आणता जनशक्तीतून सर्वसामान्य होतकरू मध्यमवयीन युवकांना संधी मिळावी अशी मागणी आपण लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे.
-सुजित चौधरी, सामाजिक कार्यकर्ते
स्व. आण्णासाहेब मगर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व साधारण सभासदांचा विचार केला पाहिजे. हवेली तालुका पुणे शहराजवळ असल्यामुळे शेत जमिनीचे गुंठेवारीत रुपांतर झाले आहे. भरपूर पैसा आल्यामुळे या निवडणुकीत साम, दाम, दंडही वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी साम दाम दंडाचा उपयोग नसून साखर क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती कारखान्यावर संचालक म्हणून जाणे गरजेचे आहे.
-सतीश जवळकर, म्हातोबाची आळंदी येथील शेतकरी