राजगुरूनगर – खेड तालुक्यातील अनेक गावांसह शेत शिवारात वर्षानुवर्षे वीजवाहक तारा लोंबकळत आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. अनेक गावांमध्ये वीज खांबांना गंज आल्याने ते नादुरुस्त झाले असल्याने या सर्वांचा धोका सर्वसामान्य नागरिक शेतकरी याना निर्माण झाला आहे. वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका वाढला आहे. विजेचे खांब लोंबकळत असलेल्या तारा दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करीत आहेत.
खेड तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात वीज वाहक तारा शेतकऱ्यांच्या शेतात खाली आल्या आहेत. सहज स्पर्श होईल इतक्या खाली आल्या आहेत. 440 व्होल्टच्या सूचना या वीज वाहक खांबावर लिहल्या आहेत. सर्वसामान्य माणसांमध्ये याची मोठी भीती आहे. तथापि अनेकदा वीज वितरण विभागाशी स्थानिक वायरमन यांच्याशी तक्रारी करूनही त्यावर काहीच उपाययोजना केली जात नाही. वरिष्ठ अधिकारी ग्रामस्थांची शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाहीत वरवरची उत्तरे देत त्यांच्या समस्या सोडवत नाहीत. यामुळे वीज वितरणचा झटक्यात शेतकरी सर्वसामान्य नागरिक भयभीत आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही या विद्युततारा सरळ केल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये 1972पूर्वी लोखंडी खांब उभे करून विद्युत तारा टाकण्यात आल्या आहेत. हे खांब जीर्ण होऊन गंजले आहेत खालून ते वीज तारांवर लटकले असल्याची काही गावांमध्ये परिस्तिथी आहे. अनेक तारा घराच्या छपरांवर टेकल्या आहेत. याचा मोठा धोका असताना वीज वितरण विभागाचे कर्मचारी अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात. तालुक्यात अनेक रस्त्यांच्या कडेने विज वाहक खांब आहेत ते रस्त्यात आहेत अनेकदा त्याला धडकून अनेक अपघात झाले आहेत.
मात्र हे विजेचे खांब आहे त्या लागून खरपुडी, रेटवडी, निमगाव, दावडी या परिसरातील शेतात जमिनीवरून हाताचा स्पर्श होईल, अशा पद्धतीने विद्युत तारा खाली येऊन धोकादायक बनल्या आहेत. याशिवाय शेतात बसविण्यात आलेल्या बहुतेक ट्रान्सफॉर्मर अर्थात डीपीला महावितरणतर्फे संरक्षण जाळी बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे या डीपीवर वीजपुरवठा खंडित झाल्यावर शेतकरी स्वतःच डीपीवर जाऊन फ्यूज टाकून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यामुळे ज्यांनाही भीतीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
खरपुडी परिसरात ट्रान्स्फार्मर व वीज वाहक तारा हात पोहचेल इतक्या खाली आल्या आहेत. शेतातील वीजवाहक खांब वाकले आहेत. महावितरण अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रारी करून कुठलीही दखल घेतली जात नाही. वेळीच दुरुस्ती झाली नाही तर चांडोली येथील वीज कार्यालयावर शेतकरी मोर्चा नेऊन आंदोलन करतील.
– जयसिंग भोगाडे, सरपंच खरपुडी.