चिंबळी (ता. खेड) : परिसरात पसरलेले दाट धुके.
बेल्हे/चिंबळी – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात तर खेड तालुक्याच्या दक्षिण भागात सोमवार व मंगळवार (दि.29) दोन दिवस पहाटे पासून दाट धुके पडले होते. दोन्ही तालुक्यात रविवारी (दि. 26) झालेल्या अवकाळी पावसानंतर दोन दिवस दाट धुके पसरत आहे. या धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
अवकाळी मुळे बर्याच शेतकर्यांचे नुकसान झाले असून ज्वारी, मका भुईसपाट झाले आहे. दोन दिवस सकाळी उशिरापर्यंत धुक्यामुळे संपूर्ण परिसर झाकोळल्या सारखा दिसत होता. मागच्या आठवड्यामध्ये थंडी गायब झाली होती; परंतु तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल पुन्हा होऊन परिसरात थंडीची लाट पसरली आहे.
अवकाळी पावसाच्या सरी झाल्याने वातावरणात गारवा तयार झाला आहे. नागरिकांनी सकाळी धुक्याचा आनंद घेत ‘मॉर्निग वॉक’ची मजा घेतली. सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा या पिकावर ‘मावा’ या किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारणी केली तरी आठ दिवसांत पुन्हा कांद्यावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येतो.
माव्याचे किटक कांदा पाथीतील पोषणतत्वे शोषून घेतात त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. शेतकर्यांना फवारणीचा खर्च वाढला आहे. वातावरणाच्या या बदलाचा परिणाम पिकावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी वर्गावर चिंतेच सावट आहे.