पश्चिम भागातील निसर्ग खुलला : पर्यावरण शुल्क नाका
जुन्न – जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागांतील सर्वात शेवटचे गाव असलेल्या आंबे, हातवीज परिसरात सध्या हजारो पर्यटक येत आहेत. येथील दुर्गादेवी मंदिर, कोकणकडा, देवराई, कांचन धबधबा, खुटादरा व डोनीदरा घाटवाटा, विविध प्रकारची जैवविविधता, ढाकोबा आदी धुक्याने व्यापलेली निसर्ग संपन्न पर्यटन स्थळे मुंबई, कल्याण, नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे व अन्य ठिकाणच्या पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे बनली आहेत. त्यामुळे या गर्दीचे शिस्तबद्ध पर्यटनात रूपांतर करणेकामी आता ग्रामस्थ व वनविभाग येथे पर्यावरण शुल्क आकारणार आहेत.
दरम्यान अनेकदा पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. यामध्ये प्लॅस्टिक कचरावाढ, मद्यधुंद पर्यटन, हुल्लडबाजी आदी प्रकार घडतात. हे रोखण्यासाठी जुन्नर वनविभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीने प्रथमच या परिसरात टोल नाका उभारला आहे. या शुल्क वसुलीचा शुभारंभ उपवनसंक्षक अमोल सातपुते यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले की या टोल नाक्यामुळे शिस्तबद्ध पर्यटनासोबतच स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असून कोणत्याही प्रकारे पर्यावरणास नुकसान होईल असे वर्तन येणाऱ्या पर्यटकांनी करू नये, असे आवाहन सातपुते यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, हातवीजचे सरपंच महादू निर्मळ, उपसरपंच मीना भालचिम, पोपट रावते, मिलिंद मडके, गणपत पारधी, किसन पारधी तसेच वनपाल शेखर बैचे, मारुती फुलसुंदर, वनरक्षक रमेश खरमाळे, सचिन कवटे, संदिप लांडे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोपट रावते यांनी केले.