राहुल गणगे
पुणे -गेल्या दिवाळीत प्रदूषणावरून केंद्र व राज्य सरकारने निकष काढले, नागरिक, विद्यार्थ्यांना शपथ देत फटाके विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आणली होती. यंदा करोनाच्या नावाखाली नियमावली काढत सरकार फटाक्यांसह विक्रेत्यांची मुस्कटदाबी करणार की नियमानुसार परवानगी देणार याबाबत सध्या ग्रामीण भागातील फटाका विक्रेत्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
प्रशासनाने याबाबत योग्य पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणीही सध्या जोर धरू लागली आहे. गेल्यावर्षी फटाके व्यवसायाला नोटबंदी, मंदी, पर्यावरणपूरकतेचा मोठा फटका बसला. त्यामुळे दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर पाणी फिरले होते.
यंदा करोनामुळे काही नागरिकांच्या नोकरीवर गदा आली आहे. करोनामुळे गावागावांत झालेली मनुष्यहानी यामुळे महाराष्ट्रात दुःखद परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत छोट्या, मोठ्या व्यावसायिकांसह मोठा परिणाम फटाका विक्रीवर होण्याची शक्यता आहे. अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरू लागले आहेत. गेल्या वर्षीचा माल तसाच पडून असल्याने यंदाही तशीच परिस्थिती राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
करोनामुळे यंदाही सर्वत्र मंदीचे सावट आहे. आता दिवाळीतही फटाके विक्रेत्यांवर संक्रात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वच व्यावसायिकांना मंदीचा फटका बसल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे. आठवडे बाजारात शिराई, पणती, लाह्या, बत्तासे, आकाश कंदील यांची विविध दुकाने सध्या सज्ज होऊ लागली आहेत.
दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे प्रदुषणाचे प्रमाण दुपटीने वाढते. थंडीत वातावरणात दमटपणा आणि झालेल्या बदलामुळे श्वसनाचे विकार वाढीस लागतात. करोना आजार श्वसनाशी निगडीत आहे. दिवाळीदरम्यान होणारे प्रदूषण तसेच दमट हवा आदी कारणांमुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते. फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात, जे हवेत धुलिकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात.
श्वसनलिका, फुप्फुस आणि दम्याच्या रुग्णांना फटाक्यांतील दूषित वायूंचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे अशीही दुसरी बाजू सरकारला विचारात घ्यावी लागणार आहे. करोनामुळे यंदा सर्वच सणांवर पाणी फिरले आहे. एकीकडे सरकार अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यासह उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहत आहे. त्यामुळे लघु उद्योजकांचे लक्ष केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.
इकडं आड, अन् तिकडं विहीर
सध्या करोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे दिवाळीत प्रदूषणामुळे करोनाची रुग्णसंख्या आणखी वाढते की काय असे वाटत आहे. त्यातच नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न समोर येत आहे. यामध्ये इकडं आड अन् तिकडं विहीर अशी अवस्था केंद्र आणि राज्य सरकारची होणार आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदुषणाचे प्रमाण दुपटीने वाढते. दिवाळी दरम्यान श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते. याबाबतही सरकारची योग्य भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या वर्षी दिवाळीत सिझन संपल्यावर पुढील वर्षीसाठी अनामत रक्कम भरावी लागते. यंदा करोनामुळे फटाका कारखाने बंदच आहेत. ते कामगारही बेरोजगार आहेत. सरकार काय निर्णय घेते त्या नियमावलीच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. ती नियमावली पाळण्यास आम्ही तयार आहोत. सरकारने योग्य निर्णय घेतला तर आमच्या रोजगाराचाही प्रश्न मार्गी लागेल.
– महेश गंगावणे, फटाके व्यवसायिक, रांजणगाव.
सध्या करोनाची भयावह परिस्थिती आहे. पूर्वीच्या नियमावली तसेच सरकारच्या सुचनांबाबत योग्य माहिती घेऊन त्यानुसार विचार विनिमय करण्यात येईल. करोना, प्रदूषणाबाबत सरकारकडून येणाऱ्या सुचना व नियमावलीनुसार फटाके विक्रेत्यांसह सर्व लघु उद्योजकांसाठी दिलासादायक निर्णय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे