केतकावळ -बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये महायुतीचे सरकार असताना रस्त्यावरील खड्डे दाखवण्यासाठी “सेल्फी विथ खड्डे’ ही मोहीम राबवली होती. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, यंदा पावसामुळे पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून खासदार सुळे यांच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खड्ड्यांचा विसार पडला का? अशी उपरोधिक टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष डॉ. विनय दगडे यांनी केली आहे.
पुरंदर तालुक्यात सध्या पावसाने हाहाकार केला असल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे म्हणण्याची वेळ आली आहे. वाहन चालक तर सोडाच; परंतु पायी चालतानाही अवघड झाले आहे. त्यामुळे केवळ सत्तेत येण्यासाठीच खासदार सुप्रिया सुळे यांनी “सेल्फी विथ खड्डे’ची मोहीम राबविली होती का?
सध्या त्याच खासदार असून सत्तेत त्यांचाच पक्ष असताना रस्त्यावरील खड्डे का बुजवले जात नाहीत ? ज्या ठिकाणी खड्डे बुजवले जात आहेत त्या ठिकाणी केवळ मुरूम आणि माती टाकून बुजवले जात आहेत; परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही डॉ. दगडे यांनी केला आहे.
केवळ पुरंदर तालुकाच नाही तर संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची हीच परिस्थिती आहे. एकही रस्ता सुरक्षित राहिलेला नाही. एकही रात्याच्या साईड पट्ट्याच राहिलेल्या नाहीत. रस्त्यांवर सूचना फलक, पारदर्शक दिवे, सांकेतिक चिन्हे तर दिसतच नाहीत. अशी भयान अवस्था असताना खासदार सुळे यांना ते दिसत नाहीत का? तर बारामतीच्या रस्त्यांना निधी त्वरित मिळतो; परंतु इतर तालुक्यांना तो त्या प्रमाणात का मिळत नाही? बारामतीकर इतर तालुक्यांना सापत्नभावाची वागणूक का मिळते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
उपाययोजना करण्यातही अपयश
संपूर्ण देशात बारामती लोकसभा मतदार संघातील तालुक्यात करोनाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची पिळवणूक केली जात असून सरकारी रुग्णालयात हेळसांड केली जात आहे; परंतु एवढ्या तक्रारी येवूनही खासदार सुळे आणि आमदार संजय जगताप मात्र गप्प आहेत याचे गौडबंगाल काय? असा प्रश्नही डॉ. विनय दगडे यांनी उपस्थित केला आहे.