वाल्हे – लोकसंख्येच्या तफावतीमुळे वाल्हे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीला मिळणार्या अनुदानावर मागील पाच वर्षांत मोठा परिणाम झाला आहे. चौदावा वित्त आयोगाचा निधी इतरत्र ग्रामपंचायतींना गेल्याने सासवड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर 10 जून 2019 मध्ये वाल्हेकर ग्रामस्थांनी लोकसंख्येनुसार 14 वित्त आयोगाचा निधी गावाला मिळावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन छेडले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर निश्चित तोडगा काढू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते; मात्र पाच वर्षांत काहीच तोडगा निघाला नसल्याने खासदार सुळेंचे आश्वासन हवेत विरले का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
वाल्हे ग्रामपंचायतीच्या सभागृहात शनिवारी (दि11) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीतील वॉर्ड रचनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मागील पंचवार्षिक निवडणुकी अगोदरच वाल्हे ग्रामपंचायतीचे दि. 2 नोव्हेंबर 2017 मध्ये विभाजन होऊन वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी, वागदरवाडी या नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती झाली होती. मात्र, विभाजनाचे वेळेस नमूद लोकसंख्या व वाड्या-वस्त्या मतदानाच्या वेळी पुन्हा ग्रामपंचायत वाल्हे कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्या असल्याने, सद्यःस्थितीत वाल्हे ग्रामपंचायतीची लोकसंख्या कमी म्हणजे 4747 (2011 जनगणेनुसार) तर मतदार संख्या मात्र 5706 इतकी आहे.
आता पुन्हा ग्रामपंचायतची निवडणूक आली आहे. यादरम्यान, वॉर्ड रचने संदर्भात नियोजित बैठकीमध्ये ग्रामस्थांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. वाल्हे गावच्या लोकसंख्येत प्रत्यक्षात 1775 लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे. मात्र, या लोकसंख्येचा निधी मात्र दुसर्या ग्रामपंचायतींना मिळत असल्याने वाल्ह्याचा विकास होत नसल्याने वाल्हेकर आता संतप्त झाले असून, याबाबत सोमवारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली.
यावेळी सरपंच अमोल खवले, सचिन लंबाते, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष समदास भुजबळ, सत्यवान सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, तलाठी नीलेश अवसरमोल, आतिश जगताप, अमोल भुजबळ, राजेंद्र पवार, सागर भुजबळ, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, रामदास राऊत, अनिल भुजबळ, तानाजी भुजबळ, दीपक कुमठेकर, शिरीष नवले, सुजित राऊत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार –
वाल्हे परिसरातील विकासकामे करताना निधीची कमतरता निर्माण होत असून या निवडणुकीपूर्वी वाल्हे ग्रामपंचायतीचा या लोकसंख्येचा निधी इतरत्र दुसर्या ग्रामपंचायतीकडे न जाता तो वाल्हे ग्रामपंचायतीस मिळावा, आताच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार पाच प्रभागांमधून पूर्वीच्या 13 सदस्यांमध्ये अजून वाढीव 2 नवीन सदस्यांची भर घालून प्रत्येक प्रभागाला समान तीन सदस्य करण्यात यावेत, अशी मागणी एकमुखी मागणी करण्यात आली. या मागण्या पूर्ण झाल्या, तरच आम्ही ग्रामपंचायत निवडणूकमध्ये सहभाग घेऊ; अन्यथा आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असे म्हणत उपस्थितांनी हात उंचावून एकमुखी ठराव घेतला.